सुस्वागतम्

प्रगत जि.प.शाळा या दररोज अपडेट होणाऱ्या सांकेतस्थळावर मी श्री घोरवाडे बी.एस.आपले सु-स्वागत करतो.

सावित्रीबाई फुले : जीवन प्रवास

सावित्रीबाई फुले : जीवन प्रवास 
आधुनिक युगात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात मोलाची कामगिरी करता आहेत. भारतीय स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावित्रीबाई फुले यांचा सिंहाचा वाट आहे. त्यांच्या पतीसह त्यांनी शिक्षण प्रसाराचे आणि समाज सुधारणेचे काम करण्यात आयुष्य खर्ची केले.
बालपण :
सावित्रीबाई यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ मध्ये साताऱ्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. तेव्हा बालविवाहाची प्रथा रूढ असल्यामुळे वयाच्या सातव्या वर्षापासूनच सावित्रीबाईंच्या आई-वडिलांनी स्थळ पाहण्यास सुरु केले.१८४० साली नऊ वर्षाच्या असताना सावित्रीबाईंचा विवाह ज्योतीराव फुले यांच्याशी झाला. तेव्हा ज्योतीरावांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते. सावित्रीबाई एका ख्रिश्चन मिशनर्यांनी दिलेले पुस्तक सासरी घेऊन आल्या. ज्योतीरावांना त्यांच्या मावस बहिण सगुणाऊमुळे आधीच शिक्षणाची ओढ होतीच पण त्यांनी आपल्या पत्नीला असलेली शिक्षणाची आवड ओळखून त्यांनाही शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले.
वैयाक्तिक आयुष्य :
सावित्रीबाई व ज्योतीराव फुले यांना स्वताचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला होता. पुढे त्यांनी यशवंतलाच रीतसरपणे दत्तक घेतले. तसेच त्याच्या आईचा, काशीबाईचाहि सांभाळ केला.त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती म्हणून त्यांनी स्त्रीला सुशिक्षित व स्वावलंबी बनविण्याचा तसेच दलितांच्या उद्धाराचा विडा उचलला. त्यांना समाजातील सर्व पातळींवरून कडाडून विरोध झाला परंतु सर्व छळाला तोंड देत त्यांनी त्यांचे आंदोलन चालू ठेवले.
सामाजिक कार्य :
ज्या काळात स्त्रीला चूल व मुल या बंधनात अडकवून ठेवले होते, त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाजव्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. १ मे, १८४७ साली त्यांनी दलितवस्तीत शाळा चालू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यास नेमले.१ जानेवारी, १८४८ मध्ये ज्योतीराव व सावित्रीबाईंनी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ब्रिटीशांच्या काळात भारतीय व्यक्तीने सुरु केलेली ही पहिली शाळा होती. तसेच पुण्यात व मुंबईतही मुलींसाठी शाळा सुरु केल्या. गिरगावातील कमळाबाई हायस्कूल अजूनही कार्यान्वित आहे.
सावित्रीबाईंच्या शाळेत सुरवातीला फक्त सहा मुली होत्या, १८४८ पर्यंत त्यांची संख्या ४५ पर्यंत जाऊन पोहचली. स्त्रियांनी शिकणे व शिकविणे हे धर्माला अनुसरून नाही असे तत्कालीन उच्च वर्णीय सनातनी लोकांचे म्हणणे होते. त्यांनी सावित्रीबाईंना कठोर विरोध केला.त्या शाळेत जाऊ लागल्या की कर्मठ लोक त्यांच्यावर दगड, शेण व चिखल फेकत. काहीजण अंगावर धावूनही जात. परंतु ह्या सर्वांना सावित्रीबाईंनी खंबीरपणे तोंड दिले. त्यांना घर सोडावे लागले. सगुणाबाई त्यांना सोडून गेल्या. परंतु न डगमगता समाजसुधारणेचे कार्य त्यांनी अविरत चालू ठेवले. शिक्षणाच्या प्रसारासाठी स्त्रीचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले.स्त्रियांसोबत होणाऱ्या क्रूर प्रथांना त्यांनी विरोध केला. बाल विवाह, बाल-जठर विवाह, सती, केशवपन अश्या कित्येक रुढींच्या नावाखाली स्त्रियांवर वर्षानुवर्षे अत्याचार होत असत. बाल जठार प्रथेमुळे अनेक मुली लहान वयातच विधवा होत असत. विधवा पुनर्विवाह त्याकाळी मान्य नसल्यामुळे ज्या मुली सती जात नसत त्यांचे केशवपन करून त्यांना कुरूप बनविण्यात येई. पण इथेच त्यांचे हाल संपत नसत.उपेक्षित असलेल्या या मुली अनेकदा नराधमांच्या शिकार बनत. गरोदर विधवा व त्यांच्या संततीला समाजात मानाचे स्थान नव्हते. अशा स्त्रिया अनेकदा आत्महत्येचा मार्ग स्वीकारत किंवा गर्भपात करत. यासाठी ज्योतीबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले जे सावित्री बाईंनी समर्थपणे चालविले. अनेक स्त्रियांची बाळंतपणे केली, अनेकांचे आंतरजातीय विवाह लावून दिले. विधवांच्या पुनर्विवाह चळवळीत हिरीरीने भाग घेतला व विधवा केशवपना विरुद्ध नाव्ह्यांचा संप घडवून आणला.ज्योतीबांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी हातभार लावला. महात्मा फुलेंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचा कार्यभाग उत्तमप्रकारे सांभाळला. १८७५-१८७७ मधील दुष्काळात दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अन्नछत्रे चालविली. पोठासाठी शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांना सत्यशोधक कुटुंबात आश्रय मिळवून दिला. समाज जागृतीसाठी अनेक ठिकाणी भाषणे केली. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी’ हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांच्या कार्यात त्यांना पंडिता रमाबाई व गायकवाड सरकार यांचीही मदत मिळाली.
आयुष्याची अखेर :
१८९६ सालात पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. ब्रिटीश सरकारने रुग्णांना स्थलांतरित करण्याचे ठरविले. यामुळे लोकांचे हाल होणार हे ओळखून सावित्रीबाईंनी पुण्यात एक दवाखाना सुरु केला व रोंग्यांची अविरत सेवा करू लागल्या. यातच त्यांना प्लेगची लागण झाली.१० मार्च १८९७ साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सावित्री बाईंचे सामाजिक कार्यातील मोलाचे योगदानामुळे सावित्रीबाईंचा जन्मदिन ‘बालिकादिन’ म्हणून ओळखला जातो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा